नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 6 June 2013

नवे पान

महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी पेपरवाले काका यायचे; गेला महिना टाकलेल्या महाराष्ट्र टाईम्सचे पैसे जमा करण्यास. मला कडेवर घेऊन बाबा दार उघडीत. मग दरवाजापासून ते आत शयनगृहातील गोदरेज कपाटापर्यंत बाबांच्या कडेवर मी बसून असे. ते कपाट उघडीत. प्लास्टिकचा हिरव्या रंगाचा डबा बाहेर काढीत. त्यांनी आणि आईने महिन्याच्या पहिल्या तारखेलाच रात्री जागून दोघांच्या पगारातून वेगवेगळी पाकीटं तयार करून त्या डब्यात ठेवलेली असत. दूध, शाळा फी, वाणी, वगैरे. त्यात एक असे पेपर बिल. त्यातले पैसे बाबा पेपरवाले काका, बागवे ह्यांच्या हाती सुपूर्द करीत असत.

काका अजूनही डोळ्यासमोर येतात. काळसर वर्ण. पांढरा सदरा व पांढरा लेंगा. हातात पावती पुस्तक. हसतमुख चेहरा. बाबांच्या हातातून पैसे घेतले की जे काही एखाददुसरं मिनिट त्यांना पावती लिहिण्यास व फाडण्यास लागे त्यात त्यांच्या बाबांशी दोनचार वाक्यांच्या गप्पा होत असत. काका मान डोलावत निघून जात. बाबा दार बंद करून आत येत. मी कडेवरच. 

वर्तमानपत्र रोज दाराखालून सरकत असे. नित्यक्रम.
काही माणसं आपल्या आयुष्याला घड्याळ जोडतात.
अदृश्य घड्याळ. 

माझे घर आणि माझ्या आईबाबांचे घर ह्यात तसे फारसे अंतर नाही. त्यामुळे ज्यावेळी आम्ही इथे रहावयास आलो त्यावेळी बागव्यांशिवाय कोणी इतर पेपर टाकू शकेल असे कधी माझ्या मनात नाही आले. आमच्या घरी देखील पेपरवाले बागवेच वर्तमानपत्र टाकू लागले.

वर्तमान भूतकाळात जमा होत गेला.
आमच्या घरातील माणसांची गणती कमी अधिक होत गेली.
आणि कधीतरी "मी बागव्यांचा मुलगा. बाबा गेले. आता मी पेपर टाकीत जाईन." असे म्हणत एक मध्यम उंचीचा तरुण मुलगा दारात उभा राहिला. रहाट गाडगं अथक फिरू लागलं.

आत्मकथा जगता जगता, त्यातील लढे लढता लढता माझे इतर कादंबऱ्या वाचणे बंद पडले होते. वर्तमानपत्र वाचणे वाढले. कळायला लागल्यापासून जरी महाराष्ट्र टाईम्स डोळ्यांसमोर होता तरी आता ते वर्तमानपत्र शहाण्याने हातात धरण्याच्या लायकीचे वाटेनासे झाले. टाईम्सच घरात नको म्हटल्यावर टाईम्स ऑफ इंडिया देखील बंद करून टाकला. मग लोकसत्ता, डिएनए, हिंदुस्तान टाईम्स दरवाजाच्या कडीमागे रोवून ठाम उभे लागू लागले. जाणीवा विस्तारू लागल्या. निदान तसा समज होऊ लागला.

महिन्याच्या पहिल्या रविवारी धाकले बागवे पेपर बिल घेण्यासाठी येऊ लागले. आईवडीलांच्या चांगल्या सवयी आपण बहुधा उचलत नाही. आनुवंशिकतेने जे गुण येतात तेव्हढे फक्त आपल्यात शिरतात. त्यामुळे बागवे माझ्यासमोर पेपर बिल धरत, व मी त्यांना तितकी रक्कम देऊन टाके. आईबाबा करीत तसा महिन्याचा खर्च लिहून ठेवणे वगैरे लग्नाच्या सुरवातीला काही वर्षं केलं.
चांगल्या सवयी सदऱ्यावर पडलेल्या गुलाबाच्या पाकळीसारख्या असतात. मागमूस न ठेवता गळून जातात.

गेले काही महिने मात्र रोजचे वर्तमानपत्र दारी येण्याची वेळ हळूहळू पुढे सरकू लागली. घड्याळ बेताल झालं. पुढे पुढे सरकू लागलं. कधी आठ. कधी नऊ. तर कधी पार दहा. बागव्यांना फोन लावले. विनंत्या केल्या. पत्र टाकणाऱ्या मुलाची वेळ साधून गाठ घेतली. उशिरा येण्यामागचे त्याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. "मला नऊ वाजता घरातून निघणे भाग आहे…त्यामुळे तू नऊला पाच मिनिटं असताना पेपर टाकलास तर काय फायदा ? मला वाचायलाच वेळ मिळत नाही. रद्दी फक्त वाढते…बाकी काही नाही !" चांगले शब्द…थोडा ओरडा…विनंत्या…आवाज वरखाली करीत मी माझा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून पाहिला. प्रश्नाच्या मुळापाशी शिरून त्या मुळाचा नायनाट झाला तर प्रश्न पुन्हा उद्भवणार नाही अशी आशा मला नेहेमीच असते.

"एक तारखेपर्यंत बघा. नाहीतर बंद करा." धाकले बागवे एकदा फोन केला तेव्हा म्हणाले.
"बरं."
बऱ्याचदा कमी शब्दांमागे विचारांची आवर्तने दडलेली असतात.

'बागवे' हे आडनाव…त्यांचे वडील, माझे वडील…वर्तमानपत्र वाचण्याची माझी सुरवात…वगैरे.
विचारांना चित्रांची जोड. आमच्या घराचा दरवाजा…थोरले बागवे…आणीबाणीच्या काळात रोजच्या पेपराची वाट बघणारे बाबा…

घडाळ्यात नऊ…खांद्याला पर्स…उबदार घराबाहेर पडून बंद वातानुकुलित कचेरीत शिरण्याची वेळ…दार उघडले तर पायाशी वर्तमानपत्र. 'रविवारी रद्दीवाल्याला बोलवायला हवं. कपाटात रद्दी ओसंडून वहायला लागली आहे.'

पहाटे साडेसहाच्या सुमारास चालून परत येताना दिसले होते, तळमजल्यावरील आंबेकरांच्या दारात त्यांचा पेपर विसावला होता.

त्यांच्या दरवाजाची घंटा वाजवून, त्यांच्या पेपरवाल्याचा दूरध्वनी क्रमांक घेण्यास मोजून दोन मिनिटे.
"मी निगवेकर. आंबेकरांच्या घरी तुम्ही पेपर टाकता ना ? सकाळी साडे सहाच्या आत ? उद्यापासून आमच्या दारी पण तुम्ही पेपर टाका."
"टाकतो."

दुसरा फोन…
"बागवे, मी निगवेकर बोलतेय. उद्यापासून तुम्ही टाकू नका आमच्या दारात पेपर."
"चालेल."

माझ्या आठवणींचा बाडबिस्तरा मी आवरला, कचऱ्याच्या पिशवीत भरला, घराबाहेर ठेवून दिला. जिथे बागवे पेपर ठेवीत असत…तिथेच !

बागव्यांच्या वडलांशी मी बालपणी नातं जोडलं होतं. बाबांच्या कडेवर बसून. त्यांच्या मुलाशी त्याचा काय संबंध ? 'चालेल'…ह्या एका शब्दात मला त्या मागे पडलेल्या आठवणीतून बागव्यांनी बाहेर आणलं…धाकले बागवे वर्तमानपत्र टाकण्याचा धंदा करीत होते… दारोदार नाती जोडीत फिरत नव्हते !

तसंही…
झाडाचे एखादे पान गळले तर त्या झाडाच्या आयुष्यात असा काय फरक ?
तिथे नवे पान फुटते…जागा भरून निघते.
मलाही हे अंगवळणी पाडून घ्यायला हवे.


7 comments:

Shriraj said...

Maze baba kahi babtit tuzyasarkhech aahet. Ha lekh vachtana mla prakarshane hey janavla

Anagha said...

तृप्ती, :)

Anagha said...

श्रीराज, पूर्वी अशी आपल्याला सवयच होती ना ? आपल्या घराशी संबंधित असलेला प्रत्येक माणूस हा आपल्या घराचाच एक घटक असे. आणि बाबा सगळ्यांना तसेच वागवीत असत. पण हल्ली तसं नसतं ना ? अजून अंगवळणी पडत नाही हे काही. जित्याची खोड आहे बहुतेक… :)

भानस said...

ज्याच्यात्याच्यात जीव गुंतवायची आपल्या मनाची जूनी खोड फार त्रास देऊन जाते आताशा मला. सवयी जाणिवपूर्वक बदलायला हव्यात आणि अंगवळणीही पाडून घ्यायला हव्यात हेच खरं... !

Anagha said...

तृप्ती, :) :)

Anagha said...

श्रीराज, जुनी पिढी ! :D

Anagha said...

भाग्यश्री, खरोखर गं ! मेला ज्याचा त्याचा विचार ! :) :)