नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 11 January 2013

यात्रा की जत्रा ?

काही गोष्टी अनाकलनीय असतात. काही माणसांच्या विचारांना समजून घ्यावयाचे म्हटले तरी कठीण जाते. कारण आपण आपल्या अनुभवांतून आपले विचार तयार केलेले असतात. व जर ते विचार तत्वांवर आधारलेले असतील तर त्या विचारांची बोट कुठल्याही वादळात सापडून तिच्या चिंधड्या होऊ नयेत असा आपला प्रयत्न रहातो.

नमनाला घडीभर तेल !

काल हमरस्त्यावरून गाडी गेली. पवईच्या दिशेने. मी काही गाडी चालवत नव्हते. आणि गाडी न चालवता नुसतंच बसायला मला भारी आवडतं. माझं शहर म्हणजे फक्त, डावंउजवं वळण न रहाता...निळेशार अथांग आभाळ, नक्षीदार जुनी लाकडी खिडकी, डबक्यात अंगावरून शिंतोडे उडवणारा कावळा, असं बरंच काही दिसू लागतं.

घाटकोपरच्या आसपास नजर पडली ती पिवळा गणवेष घालून निघालेल्या मंडळींवर. गाडी पुढे जाऊ लागली आणि पदयात्रेत सामील झालेल्यांचा चढता आकडा लक्षात आला. सगळे तरुण दिसत होते. यात्रेच्या मुखाशी एक छोटी पालखी होती. लाल कापडाने गुंडाळलेली. अध्येमध्ये वाऱ्यावर हलणारी जरी. मंडळी हसतमुखाने चालली होती. मी गाडीतील सहप्रवाश्याला सहज विचारलं...
"ही मंडळी कुठे निघाली असावीत ?"
"शिरडीला !"
"कशावरून ? तसं काही लिहिलेलं दिसत नाहीये कुठे."
"म्हणजे शिरडीला जात असावेत...पालखी घेऊन."
"हं...सगळ्यांनी सुट्टी घेतली असेल...नाही का...कामावरून ?"
"हो...अर्थात !"
"पण नक्की काय करायचं काय असं पालखी नेऊन ?"
"मी कधी गेलो नाही असा...पण दहा दिवस वगैरे लागत असावेत...आणि एकत्र गप्पा मारत...खेळीमेळीत लोकं जातात...हे चांगलंच नाही का?"
"कसं काय ? चांगलं कसं काय ? शिरडीच्या साईबाबांच्या रहाणीमानाच्या अगदी उलटा कारभार तिथे चालू असतो...आणि अशा ठिकाणी हे असं आपण जायचं ह्याचा अर्थ आपण गैर विचारसरणीला पाठींबा देत आहोत असा नाही का होत ?"
"तितका विचार करायचा का पण ? निदान तरुण लोकं एकत्र येतात...आठ दहा दिवस एकत्र प्रवास करतात...काही नवनवीन कल्पना निघतात..."
"अहो पण...जिथे आपण निघालो आहोत...तिथला कारभार ज्या संकल्पनेवर चालतो तो आपल्याला पटतो का ? आणि जर पटत नसेल...तर मी हे असं शक्ती आणि वेळ घालवून जावेच का तिथे ? हे माझ्या देशातील तरुणवर्गाची शक्ती आणि वेळ वाया घालवण्यासारखे नाही का ? आणि असं जथ्याने तिथे जाणे म्हणजे त्या गैर कारभाराला पाठिंबा दिल्यासारखेच नाही का ? अगदी असं एकत्र यायचंच आहे...त्यांच्याकडे वेळ आहे...तर त्यांनी निघावं आणि एखादी आदिवासी पाड्यातील शाळा गाठावी आणि जे काही दिवस त्यांच्याकडे आहेत ते दिवस तेथील मुलांबरोबर काढावेत ! त्यांना काही शिकवावं...पुस्तकं वाचून दाखवावीत....!" माझा आवाज आता जरा चढलाच. जसं काही माझे सहप्रवासीच जबाबदार होते, त्या तरुणवर्गाच्या पदयात्रेला.
"हा एव्हढा विचार कोणी करत नाही !"
"पण करायला हवा ना...?" क्षीण स्वरात मी प्रश्न विचारला.
 "हो...करायला हवा...पण हल्ली आपले राजकारणी देखील हा असा तरुणवर्ग गोळा करतात...आणि त्यांना तुमचा खर्च आम्ही करतो...तुम्ही जा देवदर्शनाला...अशी गाजरं दाखवतात..."
"सगळा दोष पुढाऱ्याचाच असतो का? आपल्याला स्वत:ला विचार करता येत नाही का ?"
पालखीयात्रा आता बरीच मागे राहिली होती.
"...कोण जाणे...ही मंडळी जाणार देखील असतील...अशीच एखादे काही भले काम करत...आणि सर्वात शेवटी ते देवदर्शन घेणार असतील....नाहीतर तो देव तरी कशाला देईल आशीर्वाद ? वेळ फुका घालवला तर ?...Benefit of doubt देऊया त्यांना...!" मी म्हटले.
"हो...तसेही असेल...." सहप्रवासी शांतपणे उद्गारले.

10 comments:

सौरभ said...

श्रद्धा भक्ती वगैरे वगैरे...

rajiv said...

मी या अशा पालख्या व मंडळी नेहमीच बघतो ..यात बाया-बापड्या व 'गोविंदा' मंडळीचा भरणा जास्त दिसतो .
यात शरीरास कष्ट देऊन एखादे उद्दिष्ट साध्य करणे हा विचार जरी असला, तरी जे उद्दिष्ट समोर असते ते म्हणजे रात्रीपासून अनवाणी चालत येउन दिवसभर उन्हातान्हात उभे राहून स्वत:करिता काही 'मागणे' मागणाऱ्या ...प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाच्या भक्तांसारखे.
हे एवढी युवा व मानवी शक्ती रस्त्याने फक्त जा-ये करते...पण मार्गावरील गावांमध्ये काय आहे व त्यांच्यासाठी काय करता येईल याचा सुजाण विचार केला गेल्याचे आढळत नाही. एकामागोमाग जाणाऱ्या मेंढरांच्या कळपाची आठवण मात्र येउन जाते.

श्रिया (मोनिका रेगे) said...

जरी हा श्रद्धेचा प्रश्न असला तरी अनघा,तू म्हणतेस तसे, आणि मला वाटले असे कि साई बाबांना देखील ह्या अश्या अनेक भक्तांनी मिळून काही सदाचाराचे कार्य केले तर जास्त आवडले असते. आपला वेळ आदिवासी मुलांना काही वाचून दाखवून,किंवा वृक्षारोपण करून,श्रमदान करून,सत्कारणी लावणे,कधीही योग्यच.

aativas said...

अशा यात्रा/जत्रांमधून समुहाने काय साधलं जातं आणि व्यक्तिश: काय साधलं जातं या भिन्न गोष्टी असतात असं माझं मत आहे. त्यामुळे जी गोष्ट सामाजिक दृष्ट्या निरुपयोगी वाटते आपल्याला - ती कदाचित त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समाधानाचे वळण आणणारी ठरते का? - माहिती नाही.

Anagha said...

श्रद्धा, भक्ती हे सर्व बरोबर सौरभ. परंतु, आपण आपली भक्ती दाखवताना, कुठल्याही गैर विचारांना पाठिंबा तर देत नाही आहोत ना ह्याचा थोडा विचार व्ह्यायला हवा. नाही का ?

Anagha said...

राजीव, समविचारी लोकांनी एकत्र येणे हे चांगलेच. त्यातून नवकल्पना जन्माला येतात...विचारांची देवाणघेवाण होते. परंतु, आपण जे करत आहोत त्यातून एखाद्या चुकीच्या गोष्टींमध्ये आपला सहभाग तर होत नाही आहे ना...ह्याची खबरदारी एक सुजाण नागरिक म्हणून घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.
पूर्वी म्हटले तसे...प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे मी गणपती दर्शनासाठी जाऊ शकत नाही. कारण ज्यातून निसर्गाची हानी होते त्या मूर्तीमध्ये आधी देव येउन बसेलच कशाला ? असा आपला माझा सरळ साधा विचार.
तेच इथेही लागू होते...असे मला वाटते. तिथे जे कोणी व्यवस्थापन सांभाळतात, त्यांना त्या गर्दीतून पाठिंबाच नाही का मिळत ?

Anagha said...

मोनिका, सद्य स्थितीमध्ये आपण फक्त आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देऊन काहीही भले होणार नाही आहे. आपण प्रत्येकाने विचार करून व जबाबदारीने वागले पाहिजे. नाहीतरी तसेही आपला देव सर्व ठिकाणी वास करतोच आहे. त्यामुळे मी घरात बसून मनोभावे त्याचे स्मरण करून त्याला नमस्कार केला तर तो त्याला पोचलेच. मग ज्या गोष्टीमधून काही कोणाचे भले होत नाही...उलट साईबाबांच्या मूळ विचारांनाच फाटा दिला जात आहे...अशा गोष्टींमागे मी माझा वेळ, वा शक्ती घालवण्याअगोदर नीट विचार करायला नको का ?

Anagha said...

सविता, त्या त्या व्यक्तीच्या सुखासमाधानाची ही बाब असते हे बरोबर. मात्र आपण काही समाजाच्या उपयोगाचे काम करण्यासाठी आपला वेळ व शक्ती व्यतीत केली तर त्यातून मिळणाऱ्या आनंदाला तर सीमाच नसेल...नाही का ? तू तर हे रोजच करत असतेस. परंतु, आम्ही जे उदरनिर्वाहासाठी काही वेगळी कामे करत असतो, त्यांना तरी निदान आपला वेळ थोडा विचार करून घालवायला हवा. आणि त्यातून वर म्हटले तसे. शेवटी, मी नक्की कुठे जाऊन पोचणार आहे...त्या तिथे चालणारा कारभार माझ्या मनाला, तत्वांना धरून आहे का....जर तसे नसेल, तर मग माझी तेथील उपस्थिती दाखवून मी नक्की काय साधणार आहे...ह्याचा विचार करायला हवा...असे आपले मला वाटते. आणि आपल्या समाधानातून, चुकीच्या गोष्टींना पाठींबा मिळू नये ह्याची खबरदारी एक नागरिक म्हणून मी घ्यायला हवी.

Shriraj said...

Anagha.... mla kadhitari aaju baajucha jag pahta ekdam depress-ch vhayla hota.... mla mahitey apan apli manasthiti bighdavun ghyaychi naste, pan tarihi jeev jalaycha to jaltoch

Anagha said...

खरंय श्रीराज, सद्य परिस्थितीत आजूबाजूला इतकं काही घडत असतं की त्यातून जगणं देखील कठीण. आपण आपलं ना आपल्या आसपास कायम आपल्या विचारांची माणसं, त्या विचारांना धरून चालणारी माणसं ठेवावीत. म्हणजे मी तसं केलंय ना...तुम्हा सर्वांना माझ्या आसपास ठेवून...म्हणून सांगतेय ! :)