नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 13 February 2011

कहाणीतील गूढ

रविवारचा सूर्य मावळत आला होता. असा निवांतपणा परत मिळवायला सहा दिवसांवर मात करायची होती. हे असं जेव्हा होतं तेव्हाच त्या जलद सरकणाऱ्या सूर्याचं मोल कळतं.
"काल ती पुन्हा निराश होती."
"मग?" प्रशस्त दिवाणखाना. उंचच उंच मोकळ्या खिडक्या. त्या खिडक्या पुढ्यात घेऊन बसलं की मन मोकळं व्हायला कितीसा अवधी?
"मग काय? काही नाही. तिला मी जे गेली सहा वर्ष सांगतेय तेच पुन्हा सांगितलं...उसाचं गुऱ्हा पुन्हा चालवलं."
"रडत होती?"
"नाही. ते झालेलं म्हणे रात्री करून."
"हम्म्म्म. मग आता?"
"मला नाही कळत हिला कसं समजवायचं ते! गेली सहा वर्ष पुन्हापुन्हा त्यांचं ब्रेकअप होतंय आणि पुन्हापुन्हा पॅचअप! तो तसाच आहे! तो नाही बदलत! आणि ही त्याला नाही सोडत!"
खिडकीवरील कावळा उगाच दोघां जिवाभावाच्या मैत्रिणींना न्याहाळत होता.
"मला वाटतं तुला आता तुझी strategy बदलायला हवीय!"
"माझी? म्हणजे?"
"साधी गोष्ट आहे. त्याचे आईबाबा लहानपणीच गेलेले आहेत. तो एकटाच वाढलेला आहे. निर्णय एकट्याने घेणे त्याच्या अंगवळणी पडले आहे. आणि कोण कधी कोणासाठी बदलतं का?"
"खरं आहे. मग?"
"ह्यातून कोण चूक आणि कोण बरोबर हे आपण काढूनच टाकूया. ज्या गोष्टीला कधीही कुठलेही ठाम उत्तर नसते त्या गोष्टीला आपण इतके महत्व का द्यावे?"
"अं?"
"All this right and wrong..let 's keep that aside."
"Okkk. And then?"
"आता ह्या घटकेला नक्की होतंय काय? तर कधी हिच्या वागण्याचा त्याला आणि कधी त्याच्या वागण्याचा हिला...पण त्रास मात्र नक्की होतोय. आनंदाचे क्षणही असतीलच आयुष्यात घडत परंतु overall effect त्रासाचा आहे. नाही का?"
"हो."
"आता आपण फक्त तिचा विचार करु...कारण ती तुझी जिवलग मैत्रीण आहे. ठीकेय? तिला त्याच्या वागण्याचा त्रास तर होतोय. परंतु, त्याच्यावरच्या प्रेमाने तो त्रास ती आज सहन करते आणि हे नातं पुढे नेते. मग असंच पुढे जाऊन एकदोन वर्षांत त्यांचं लग्न होईल आणि आयुष्य पुढे सरकेल."
"हो...बहुधा..."
"आता मन हे आपण एक कोकरू धरू... निरागस, निष्पाप. ते प्रत्येक घावाबरोबर बावचळेल, दुखावेल. परंतु, निरागस ते, तसेच कठीण पर्वत चढू लागेल...वर वर. स्वप्नातील हिरवळीच्या दिशेने. ज्या गोष्टींचा लग्न होईपर्यंत त्रास झालेला आहे, ज्यातून तिचं हे कोकरू मन गेलेलं आहे...ठेचाळलेलं आहे...तेच लग्नानंतरच्या खडतर प्रवासात अधिकाधिक जखमी होईल...आणि त्याचा स्वभाव लक्षात घेता, तो जरी राक्षस नसला तरी देखील तो ह्या कोकराला तळहातावर जपणारा मेंढपाळ देखील नाही. नाही का?"
"ह्म्म्म. मग?"
"मग काही नाही . कधीतरी ह्या सगळ्याचा कडेलोट होईल...आणि ह्या कोकराकडून एखादं पाऊल जरी चुकीचं पडलं तरी मग त्याला माफी नसेल...असेल तो फक्त कपाळमोक्ष. हा मेंढपाळ नाही जपणार ह्या कोकराला. ह्याच्या शेकडो चुका ती आंधळ्या प्रेमाने माफ करून जाईल, सपशेल डोळेझाक करेल...आणि तिची एक चूक मात्र त्यांना आयुष्यातून उठवेल."
.........
"तुझे का डोळे भरले?"
"कारण मला माझी मैत्रीण आयुष्यात सुखीच व्हायला हवीय !"
"बघ हेच तिला सांगून. सांग तिला स्वत:च्या सहनशक्तीच्या मर्यादा जाणून घ्यायला. धनुष्य किती ताणलं जाऊ शकतं ह्याचा अंदाज, बाण टेकवण्याच्या आधीच घ्यावयास सांग."
.......
"आणि त्याही पलीकडे जाऊन एक ध्यानात ठेव तू."
"काय?"
"जे तिच्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे...ते घडणारच आहे..."
"कसला कर्कश आहे हा कावळा!"
ती हसली...."हो का? कधी ऐकलास तू गोड आवाजात गाणारा कावळा?"
दोघींच्या गप्पा तर संपल्या हसतहसतच...परंतु, हसण्यावर सोडून देता येणाऱ्या त्या तिसरीच्या नशिबात, काय लिहून ठेवलंय हे तर काळच जाणे.
आणि कहाणीतील गूढ कायम राखण्याची हातोटी, कोणी या काळाकडूनच शिकावी!






15 comments:

Raindrop said...

i wish i could dive into 'kalachya potaat' and get out the 'good'...then we would be able to change things na

Anagha said...

वंदू, तिच्यासाठी म्हणून जी गोष्ट लिहिली गेली आहे तेच होणार आहे....फक्त पुढे काय होऊ शकेल ह्याची जी चुणूक तिला 'काळ' देतो आहे, त्याकडे तिचे लक्ष वेधणे एव्हढेच तिचे हितचिंतक म्हणून आपण करू शकतो...नाही का?

भानस said...

काही गोष्टी घडल्याशिवाय, " समजतय " का तुला आम्ही काय सांगतोय/ कळतय गं पण कुठे तरी जीव अजूनही आस धरून आहे " त्यातली नेमकी दुखावणारी मर्मे समजतच नाहित हेच खरं. उगाच आपण हे दिव्य पार पाडूच या टिपिकल भ्रामक कल्पनांचा लागलेला खुळा नाद... :(

आशा आहे तिच्यापर्यंत ही कळकळ पोहोचेल.

Anagha said...

खरंच, फक्त आशा करू शकतो आपण, आणि काय करणार दुसरं...

हेरंब said...

तुझी कळकळ, काळजी त्या अज्ञात तिच्यासाठी पोहोचो याच शुभेच्छा !

Anagha said...

हेरंब, नक्की....सगळ्यांच्या शुभेच्छा एकत्रितपणे काम करू लागल्या तर त्यातून चांगलेच निघेल. नाही का? :)

धन्यवाद रे..

THEPROPHET said...

अवघड :)

Anagha said...

समजायला अवघड का विद्याधर?

सौरभ said...

कोकराचं उदाहरण इतकं चपखल दिलयं!!! आपल्याला भारीच कौतुक वाटतय ह्या समजुतदारपणाचं. आवडलं आवडलं... बाकी आपल्या शुभेच्छा... :)

THEPROPHET said...

काळाचं गणित गं.. समजायला अवघड! :)

Anagha said...

:) सौरभ, कोकरूच नाही तर काय?! :)

Shriraj said...

कटू सत्य अगदी तरलपणे मांडलं आहेस, अनघा. सुंदर! अप्रतिम!

Anagha said...

आभार श्रीराज. :)

shweta pawar said...

hi Anagha tujya tya maitrini sarkhich mi dekhil ek aahe.
majhya manach kokaru mi jyachyakade dilay to dekhil mendhpaal nahiey.
khup tras hoto g ya goshtich

Anagha said...

श्वेता, आयुष्यातील टक्केटोणपे खाल्यावर आता मला कळतं...अगदी ग्रीक कथेतील नारसिसस इतके नाही तरी स्वत:वर प्रेम करायला शिकलेच पाहिजे. कारण ते जर प्रमाणात असेल तर त्यालाच आत्मसन्मान म्हणतात...
सखे, काळजी घे...
आणि, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)